परभणी (प्रतिनिधी प्रवीण चौधरी) : शनिवारी सकाळी सुमारे ८:४४ वाजता हिंगोली जिल्ह्यात 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून त्याचे सौम्य धक्के परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्येही जाणवले. ही माहिती भूकंप मापन केंद्र, नांदेड येथून प्राप्त झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
नागरिकांनी अफवा, खोटे संदेश किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. भूकंपाच्या वेळी घरात असल्यास मजबूत टेबल, पलंग किंवा भिंतीच्या कोपऱ्यात आसरा घेऊन डोक्याचे संरक्षण करावे, तसेच धक्का थांबल्यानंतर सुरक्षितपणे मोकळ्या जागेत जावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
तसेच लिफ्टचा वापर टाळावा, विजेचे उपकरणे बंद ठेवावीत आणि कमकुवत इमारती किंवा विजेच्या तारांपासून दूर राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके (मो. 9975013726) किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02452-226400 / टोल फ्री 1077) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






















