जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. शिक्षण, स्त्री-स्वातंत्र्य आणि सामाजिक समता या मूल्यांसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महात्मा फुले यांच्या विचारांची आजही समाजाला तितकीच गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
“विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली…या विचारांच्या माध्यमातून त्यांनी समाजात जागृती घडवली. ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात जन्मलेल्या महात्मा फुले यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण घेत सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा उभारला.
३ ऑगस्ट १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेत त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून त्यांनी देशातील पहिली महिला शिक्षिका घडवली. तसेच वंचित व बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करत त्यांनी सामाजिक समतेचा पाया मजबूत केला.
सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी जातिभेद, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध ठोस लढा दिला. ‘गुलामगिरी’ आणि ‘सार्वजनिक सत्यधर्म’ यांसारख्या ग्रंथांद्वारे त्यांनी समाजप्रबोधन केले.
१८८८ मध्ये त्यांना “महात्मा” ही उपाधी देण्यात आली. २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले, मात्र त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देत आहेत. त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त करण्यात आले.






















