जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : येथे सोशल मीडियावर वाढत्या बनावट विवाह जुळवणी ग्रुप्समुळे समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विवाहासाठी तयार करण्यात आलेल्या या ग्रुप्समध्ये कोणतीही खातरजमा न करता मुला-मुलींची वैयक्तिक माहिती मोठ्या प्रमाणात शेअर केली जात असल्याचे समोर आले आहे.
अनेक प्रकरणांमध्ये मुला-मुलींचे विवाह झाल्यानंतरही त्यांचे बायोडाटा आणि परिचयपत्रे विविध ग्रुप्समध्ये फिरत असल्याने गैरसमज निर्माण होत आहेत. यामुळे संबंधित कुटुंबांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून समाजात अविश्वास वाढत आहे. काही व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी बनावट ग्रुप्स तयार करून माहितीची पडताळणी न करता ती पुढे पाठवत असल्याचेही उघड झाले आहे.
विशेष म्हणजे, या ग्रुप्समधील अॅडमिन कोणतीही जबाबदारी घेत नसल्याची तक्रार आहे. माहिती खरी की खोटी याची खात्री न करता ती शेअर केली जाते. परिणामी, आधीच लग्न झालेल्या किंवा नाकारलेल्या प्रस्तावांची माहिती पुन्हा-पुन्हा प्रसारित होत राहते, ज्यामुळे गोंधळ अधिक वाढतो.
या पार्श्वभूमीवर समाजातील जाणकार नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. संबंधित ग्रुप अॅडमिनची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच विवाह जुळवणीसाठी अधिकृत आणि विश्वासार्ह माध्यमांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रशासनाने याबाबत स्पष्ट नियमावली तयार करून अशा बनावट ग्रुप्सवर नियंत्रण आणावे, जेणेकरून समाजात पारदर्शकता आणि विश्वास कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






















