रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी प्रतिनिधी) : माघ महिन्याची सांगता होऊन फाल्गुन महिन्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात होळीच्या उत्सवाची लगबग सुरू होते. गावागावांत होळीला ‘शिमगा’ म्हणूनही ओळखले जाते. एकेकाळी शिमग्याचा उत्सव म्हणजे केवळ रंगांची उधळण नव्हे, तर पारंपरिक खेळ, लोकसंस्कृती आणि नैसर्गिक रंगांची जपणूक यांचा संगम असायचा. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ‘घाणमाकड’सारखी परंपरा नामशेष होण्याच्या मार्गावर असून आजची पिढी या अनोख्या संस्कृतीपासून दूर जाताना दिसत आहे.
घाणमाकड म्हणजे काय?
होळीच्या काही दिवस आधीच ग्रामीण भागातील युवक जंगलातून आठ ते दहा फूट लांबीचे, धनुष्याच्या आकाराचे मजबूत लाकूड आणायचे. त्या लाकडाच्या मध्यभागी मोठे छिद्र पाडले जायचे. गावातील मोकळ्या जागेत एक टोकदार लाकूड मजबुतीने जमिनीत रोवून त्यात हे छिद्र असलेले धनुष्याकार लाकूड बसवले जात असे. या रचनेलाच ‘घाणमाकड’ म्हटले जायचे.
धनुष्याकार लाकडाच्या दोन्ही टोकांवर संतुलन साधत एक-एक व्यक्ती बसत असे आणि उभे असलेले युवक ते गोलाकार फिरवत. झोका घेताना घाणमाकड वेगात फिरू लागले की त्यातून ‘कीर-कीर’ असा खास कर्कश आवाज यायचा. आवाज न आल्यास लाकडाच्या टोकावर कोळशाचे छोटे तुकडे व बिबा फोडून ठेवले जात, ज्यामुळे फिरताना आवाज निर्माण व्हायचा. हा आवाजच शिमग्याची खरी गंमत वाढवणारा ठरायचा.
लहान मुलांचा आवडता खेळ
घाणमाकड हा गावातील लहान मुलांपासून युवक-युवती आणि महिलांपर्यंत सर्वांचा लाडका खेळ होता. आळीपाळीने झोके घेताना दम लागेपर्यंत हा खेळ सुरू राहायचा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, अभ्यासाची चिंता नाही आणि डिजिटल साधनांची मोहिनी नाही.
अशा काळात मुलांचा जास्तीत जास्त वेळ पारंपरिक खेळांतच जायचा. घाणमाकड केवळ खेळ नव्हता, तर तो गावातील एकात्मतेचा आणि सामूहिक आनंदाचा उत्सव होता.
पळस फुलांचा नैसर्गिक रंग हरवला
धूलिवंदनाच्या दिवशी पळसाच्या फुलांपासून तयार होणाऱ्या नैसर्गिक रंगाला विशेष महत्त्व होते. जंगलातून पळसाची फुले आणून त्याच्या पाकळ्या पाण्यात भिजवून ठेवत आणि त्यापासून सुंदर केशरी रंग तयार केला जात असे. हा रंग पिचकारीत भरून एकमेकांवर उधळला जायचा. या रंगामुळे त्वचेला कोणतीही हानी होत नसे आणि पर्यावरणालाही धोका नव्हता.
मात्र आज बाजारातील रासायनिक रंगांच्या वापरामुळे पळसाच्या नैसर्गिक रंगाची परंपरा मागे पडली आहे. आधुनिकतेच्या धावपळीत या पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी परंपरेचा विसर पडत चालला आहे.
होळीत घाणमाकडीचा समारोप
होळीच्या रात्री घाणमाकड जाळण्याची प्रथा होती. गावकरी होळीत टाकलेल्या गोवऱ्यांची राख घरी नेऊन जपून ठेवत असत. त्या राखेला पवित्र मानले जाई. अशा प्रकारे घाणमाकडाचा समारोप होत असे आणि शिमग्याचा उत्सव रंगतदार आठवणींनी पूर्णत्वाला जात असे.
आBज मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल साधनांनी मुलांचे बालपण व्यापले आहे. पारंपरिक खेळ, नैसर्गिक रंग आणि सामूहिक उत्सवांची जागा आभासी मनोरंजनाने घेतली आहे. त्यामुळे घाणमाकडसारख्या लोकपरंपरा कालबाह्य ठरत आहेत.
ग्रामीण संस्कृतीचा हा अनमोल वारसा जपण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन नव्या पिढीला या परंपरेची ओळख करून देणे गरजेचे आहे. शिमग्याच्या निमित्ताने घाणमाकड पुन्हा उभारले गेले, तर केवळ एक खेळ नव्हे तर आपल्या संस्कृतीचा हरवलेला झोका पुन्हा अनुभवता येईल.






















