महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर) : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांची मुंबई-गोवा महामार्गावरील काही हॉटेलांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याची तक्रार पुढे येत आहे.
बस चालकांना फ्री जेवण आणि कमिशन मिळत असल्याने अनेक बस ठराविक हॉटेलांवरच थांबवल्या जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. या हॉटेलांमध्ये अत्यंत जास्त दर आकारले जात असून पाच रुपयांचा चहा २० रुपयांना, साध्या जेवणासाठी २०० रुपये, तर ४० रुपयांच्या थंड पेयासाठी १५ ते २० रुपये अधिक आकारले जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
एवढेच नव्हे तर काही ठिकाणी स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यासंदर्भात तक्रार केल्यास काही हॉटेल मालकांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. इथलं नाही पटलं तर दुसरीकडे जा, अशा उद्धट उत्तरांमुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे. प्रवाशांचे म्हणणे आहे की, ते तिकिटाचे पूर्ण पैसे भरत असल्याने बस कुठे थांबवायची यामध्ये त्यांच्या सोयीला प्राधान्य दिले गेले पाहिजे.
स्वच्छता नसलेल्या आणि जादा दर आकारणाऱ्या हॉटेलांवर बस थांबवू नये, अशी मागणी जोर धरत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी असून संबंधित परिवहन कंपन्या आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा कमिशनच्या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.






















