निलेश ठाकरे (महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज) : आजच्या काळात संगीत क्षेत्राकडे पाहिलं, तर एक विचित्र विरोधाभास नजरेस पडतो. एका बाजूला तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती, सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेली व्यासपीठं, नवोदितांना मिळालेली संधी – आणि दुसऱ्या बाजूला सुरांचा ऱ्हास, दर्जाहीन सादरीकरणं आणि बेसुरांचा अक्षरशः सुळसुळाट. हा केवळ बदल नाही, तर संगीत संस्कृतीवरचं गंभीर संकट आहे, हे मान्य करावंच लागेल.
हे स्पष्ट करायला हवं की, हा लेख कुठल्याही नवोदित कलाकारांच्या विरोधात नाही. प्रत्येकाला गाण्याचा, सादर करण्याचा आणि स्वतःला व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु प्रश्न अधिकाराचा नाही, तर जबाबदारीचा आहे. संगीत ही केवळ करमणूक नसून एक साधना आहे, एक शिस्त आहे, आणि एक परंपरा आहे. त्या परंपरेचा अपमान होईल अशा प्रकारे जेव्हा बेसुरेपणाचा उघडपणे उत्सव साजरा होतो, तेव्हा त्याविरोधात आवाज उठवणं गरजेचं ठरतं.
आजच्या काळात काही लोक दोन-चार ओळी पाठ करून, गळा फाडून ओरडले की स्वतःला ‘गायक’ समजतात. त्यात जर थोडासा भाव, थोडीशी अक्टिंग आणि सोशल मीडियावर लाईक्स मिळाले, की समजा ‘स्टारडम’ मिळालंच. पण प्रश्न असा आहे की, हे खऱ्या संगीताचं प्रतिनिधित्व करतं का? की हा फक्त दिखाव्याचा आणि स्वस्त लोकप्रियतेचा खेळ आहे?
संगीत हे केवळ आवाज काढण्याचं नाव नाही. त्यात सूर, ताल, लय, भाव, उच्चार यांचं संतुलन आवश्यक असतं. या सगळ्याचं शिक्षण घेणं, त्यासाठी मेहनत करणं, गुरूंकडून शिकणं- ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. पण आजच्या ‘इंस्टंट’ युगात ही प्रक्रिया टाळली जात आहे. लोकांना सराव नको, साधना नको, फक्त प्रसिद्धी हवी आहे. आणि याच ठिकाणी खरी समस्या निर्माण होते.
सोशल मीडियाने नक्कीच अनेकांना व्यासपीठ दिलं आहे. गावखेड्यातील, दुर्लक्षित भागातील कलाकार आज जगासमोर येत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. पण त्याच वेळी, गुणवत्ता तपासण्याची कोणतीही कसोटी नसल्यामुळे, बेसुरेपणालाही तितकाच वाव मिळतो आहे. जे खरं आहे, तेच दाखवण्याऐवजी, ‘काहीतरी वेगळं’ दाखवण्याच्या नादात संगीताची पातळी खालावत चालली आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे कार्यक्रम आयोजकांची भूमिका. आज अनेक ठिकाणी केवळ गर्दी जमवण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी कोणालाही स्टेज दिलं जातं. त्या कलाकाराचा दर्जा, त्याची तयारी, त्याचं ज्ञान — याचा विचारच केला जात नाही. आयोजकांनी जर सुर आणि बेसुर यातील फरक ओळखला नाही, तर मग रसिकांकडून काय अपेक्षा ठेवायची?
हे वास्तव आहे की, आज ‘प्रभोधनकार’ किंवा स्वतःला मार्गदर्शक समजणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. दोन-चार कविता, काहीतरी ओरडून सादर केलं, की लोकांना ते ‘कला’ वाटायला लागलं आहे. पण कला ही ओरडण्यात नसते, ती जाणिवेत असते. ती साधनेत असते. ती आत्म्याला स्पर्श करणाऱ्या सुरांत असते.
प्रश्न इथेच थांबत नाही. रसिकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. आज आपण काय ऐकतो, काय पसंत करतो, यावरच पुढचं संगीत ठरतं. जर आपण बेसुरेपणालाही टाळ्या दिल्या, तर तेच पुढे वाढणार. आणि जर आपण दर्जेदार संगीताला प्रोत्साहन दिलं, तरच खरे कलाकार टिकतील.
आज अनेकांना गाण्याचा छंद आहे, हे स्वागतार्ह आहे. पण तो छंद ‘प्रदर्शन’ बनतो, तेव्हा तो धोकादायक ठरतो. कारण प्रत्येक गोष्ट सार्वजनिक करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा -मी खरंच सुरात आहे का? जर याचं प्रामाणिक उत्तर ‘नाही’ असेल, तर आधी शिकणं गरजेचं आहे. अन्यथा, लोकांसमोर सादर केल्यावर केवळ टाळ्या मिळतीलच असं नाही, तर टीका आणि उपहासही सहन करावा लागू शकतो.
आज गरज आहे ती आत्मपरीक्षणाची. कलाकारांनी स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची, आपल्या मर्यादा ओळखण्याची आणि त्यावर काम करण्याची. त्याचबरोबर आयोजकांनीही जबाबदारीने कार्यक्रमांचं नियोजन करण्याची. केवळ पैसा आणि प्रसिद्धी यासाठी संगीताचा वापर करणं थांबवायला हवं.
संगीत ही आपली सांस्कृतिक ओळख आहे. ती केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर भावनांचं, विचारांचं आणि परंपरेचं प्रतिबिंब आहे. जर आपणच त्या संस्कृतीचा अपमान केला, तर पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार?
आज परिस्थिती अशी आहे की, बेसुरांच्या टोळीत खरे सूर हरवण्याची भीती निर्माण झाली आहे. आणि ही भीती निराधार नाही. जर आपण वेळेत जागे झालो नाही, तर उद्या खऱ्या संगीताला जागाच उरणार नाही.
म्हणूनच, आज प्रत्येकाने ठाम भूमिका घ्यायला हवी. कलाकारांनी शिकण्यावर भर द्यावा, आयोजकांनी दर्जा जपावा, आणि रसिकांनी योग्य गोष्टीला प्रोत्साहन द्यावं. नाहीतर, हा बेसुरांचा बाजार असाच वाढत राहील आणि सुरांचा आवाज कायमचा हरवेल.
संगीत वाचवायचं असेल, तर आता आवाज उठवायलाच हवा — कारण उद्या कदाचित उशीर झालेला असेल.






















