शिखर शिगणापुर (प्रतिनिधी धनंजय कावडे): मार्डी ता माण येथील सख्खे चुलत भाऊ श्री. सलीमभाई मुलाणी, श्री. नजीरभाई मुलाणी व श्री. पिरखान मुलाणी यांच्यामध्ये वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून गेल्या सुमारे २० वर्षांपासून सुरू असलेला जमीन व कौटुंबिक वाद अखेर सामोपचाराने मिटला. पोलीस पाटील आप्पासो गायकवाड व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे यांच्या संयमी मध्यस्थीमुळे दोन्ही बाजूंमध्ये यशस्वी समेट झाला.
वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटपावरून संबंधित कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून न्यायालयीन वाद सुरू होते. तसेच काही जमिनी संयुक्त मालकीच्या असल्याने त्यावरूनही वारंवार मतभेद निर्माण होत होते. या वादातून अनेक वेळा एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी व गुन्हे दाखल करण्याची वेळही आली होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील आप्पासो गायकवाड व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे यांनी दोन्ही पक्षांशी संयमाने संवाद साधत परस्पर समजूत काढली. अनेक बैठका आणि चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी सलोख्याचा मार्ग स्वीकारत दीर्घकाळ चालत आलेल्या वादावर पडदा टाकला.
या सामोपचारामुळे केवळ दोन कुटुंबांतील वाद संपला नसून, संवाद, संयम आणि परस्पर विश्वास यांच्या माध्यमातून कितीही जुने मतभेद मिटवता येतात, याचा आदर्श गावासमोर निर्माण झाला आहे.
मार्डीसह परिसरातील नागरिकांनी जमीन, कौटुंबिक किंवा इतर कोणतेही वाद वर्षानुवर्षे न्यायालयात न ठेवता शक्य तेथे सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न करावा. गावात सलोखा, ऐक्य आणि बंधुभाव जपणे हीच समाजाच्या प्रगतीची खरी दिशा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
*”वाद नव्हे, संवाद हवा; तंटा नव्हे, सलोखा हवा!”* हा संदेश या सामोपचारातून पुन्हा अधोरेखित झाला.






















