म्हसवड – माण (प्रतिनिधी महेश कांबळे) : माण तालुक्यातील तोंडले गावात अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. लाला जाधव (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाला जाधव हे नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांसह तोंडले–वारुगड रस्त्यालगत असलेल्या माळरानात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन आभाळ दाटून आले. काही क्षणातच वाऱ्याचा वेग वाढला आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. याचवेळी परिसरात विजांचा कडकडाट सुरू झाला.
या भीषण वातावरणात अचानक एका बाभळीच्या झाडावर वीज कोसळली. दुर्दैवाने त्या झाडाजवळच उभे असलेले लाला जाधव विजेच्या तडाख्यात सापडले आणि क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे एका कुटुंबाचा कर्ता पुरुष हिरावला गेला.
दरम्यान, संध्याकाळपर्यंत लाला जाधव घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत होते. त्यांच्या सोबत असलेली जनावरे व शेळ्या मात्र एकट्याच घरी परतल्याने अनर्थाची शंका अधिकच बळावली. कुटुंबीयांनी तात्काळ माळरानात धाव घेत शोधमोहीम सुरू केली.
ते नेहमी ज्या ठिकाणी जनावरे चारण्यासाठी जात असत, त्या परिसरात शोध घेत असताना बाभळीच्या झाडाजवळ लाला जाधव निपचित अवस्थेत आढळून आले. हे हृदयद्रावक दृश्य पाहताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या दुःखाने संपूर्ण परिसर सुन्न झाला.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व जाधव कुटुंबाला धीर दिला. पावसाच्या सरींमध्ये एक जीव कायमचा हरपल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबाचा आधारवड गमावल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. शासकीय सोपस्कार पूर्ण करून आपत्तीग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.






















