वटपौर्णिमेनिमित्त वृक्षमित्र फाउंडेशनकडून वडाचे वृक्षारोपण

वटपौर्णिमेनिमित्त वृक्षमित्र फाउंडेशनकडून वडाचे वृक्षारोपण

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने सरदवाडी रोडवरील महालक्ष्मी नगर येथील रामेश्वर महादेव मंदिर परिसरात वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सुवासिनींच्या हस्ते वडाच्या रोपाचे पूजनही करण्यात आले.
गेल्या पाच वर्षांपासून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे वृक्षारोपण करण्याचा उपक्रम फाउंडेशनकडून सातत्याने राबविला जात आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरात वडाचे झाड लावून त्याचे संवर्धन करावे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण, ऑक्सिजनची उपलब्धता आणि भावी पिढ्यांना सावलीचा लाभ मिळेल, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू वाघ यांनी केले.
यावेळी नगरसेविका रोहिणी मोरे, माजी नगरसेविका ज्योती वामने, सुशीला उगले, वैशाली वाघ, ह.भ.प. तन्वीताई आंधळे, प्रतिभा सोनवणे, सुनीता वारूगसे, निर्मला चौधरी, विजया खाडे, सानिका वाघ व तारा केदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपक्रमासाठी विकास गीते, अनिल उगले, अविनाश गुंजाळ, जगन्नाथ केदार, तुकाराम सांगळे आणि किरण यादव यांनी सहकार्य केले.