Times Of Maharashtra Desk : ठाणे बारावीच्या पहिल्याच परीक्षेच्या दिवशी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, डोंबिवली पूर्व येथील रहिवासी सोहम कटरे (वय १८) या विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळच्या गर्दीच्या वेळेत घडली.
सोहम कटरे हा बारावीच्या परीक्षेला बसला होता. मंगळवारी त्याचा पहिलाच पेपर असल्याने तो सकाळी लवकर घरातून निघाला होता. त्याचे परीक्षा केंद्र कळव्यातील मनिषा विद्यालय येथे होते. नेहमीप्रमाणे मध्य रेल्वेच्या लोकलने प्रवास करत असताना लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. गर्दीमुळे दरवाजाजवळ उभा असलेला सोहम अचानक तोल जाऊन खाली पडला. वेगात धावणाऱ्या लोकलखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सोहमला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सोहम हा अभ्यासू, शांत स्वभावाचा आणि सर्वांचा लाडका विद्यार्थी होता. पहिल्याच पेपरच्या दिवशी अशी घटना घडल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डोंबिवली आणि कळवा परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
या घटनेमुळे मुंबई उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गर्दीच्या वेळेत लोकल ट्रेनमधून प्रवास करणे आता जीवघेणे ठरत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.






















