Times Of Maharashtra Desk : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज १० फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असल्याने वातावरण भावनिक होते. बैठकीच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाने अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. राज्याचे मुख्य सचिवांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारिक ओळख करून देत त्यांचे स्वागत केले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. श्रद्धांजलीनंतर मंत्रिमंडळाच्या निर्णय प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
या बैठकीत अजित पवार यांनी निधनापूर्वी सुचवलेल्या तीन महत्त्वाच्या निर्णयांवर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. बारामती येथील क्रीडा संकुलासाठी ७५ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली. तसेच वालचंदनगर-रत्नापूर MIDC साठी १००० एकर जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासही मान्यता देण्यात आली. या निर्णयांसाठी अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. पक्षकारांना इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे नोटीस बजावण्याची प्रक्रिया आता कायदेशीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम २३० मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेला हा प्रस्ताव मंजूर झाल्याने जमीनविषयक प्रकरणांचा निपटारा अधिक जलद होणार आहे.
या निर्णयांमुळे प्रशासनात वेग येणार असून विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






















