Times Of Maharashtra Desk :बारावीच्या पहिल्याच परीक्षेसाठी घरातून निघालेल्या विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.डोंबिवली येथील रहिवासी सोहम कटरे (वय अंदाजे १७) याचा कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अशी घडली घटना
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत.सोहमचे परीक्षा केंद्र कळव्यातील मनिषा विद्यालयात होते. तो नेहमीप्रमाणे सकाळी लोकल ट्रेनने परीक्षा देण्यासाठी निघाला होता. मात्र सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी असल्याने त्याचा तोल जाऊन तो चालत्या गाडीतून खाली पडल्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली आहे.या अपघातात सोहमचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. बारावीच्या पहिल्याच पेपरसाठी घरातून निघालेल्या विद्यार्थ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांनीही या घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबई उपनगरीय लोकलमधील प्रचंड गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोज हजारो विद्यार्थी व प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे वास्तव या दुर्घटनेतून समोर आले आहे.
शिवनेरी गडावर तरुणाचा दरीत पडून मृत्यू
दरम्यान, जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले शिवनेरी गडावर फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिरूर येथील रहिवासी मंगेश सोनवणे याचा मृतदेह सनसेट पॉईंटजवळील कड्यावरून सुमारे ७०० फूट खोल अंबरखानाच्या पाठीमागील दरीत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच जुन्नर वनविभाग व पुरातत्त्व विभागाच्या संयुक्त पथकाने तात्काळ रेस्क्यू मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जुन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.दोन्ही घटनांमुळे राज्यात हळहळ व्यक्त होत असून सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.






















