Times Of Maharashtra Desk:राज्यात १० फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना थेट कॉपी पुरवली जात असल्याचे प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले असून या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला आहे. तसेच पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सीसीटीव्हीत कॉपीचा प्रकार कैद
परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविणे, पिण्याचे पाणी, बस व्यवस्था आणि इतर सुविधा सुरळीत ठेवण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. तरीही काही ठिकाणी परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. परीक्षा केंद्रावरील अधिकारी आणि पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचे फुटेज समोर आल्यानंतर प्रशासन हादरले आहे.राज्यात शिक्षण विभागाचेवतीने कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले जात आहे. विद्यार्थ्यांनी निर्भयपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र ज्या केंद्रांवर गैरप्रकार घडले, त्या ठिकाणी कडक कारवाई करण्यात येईल. संबंधित केंद्रांची परवानगी रद्द केली जाईल. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह केंद्रप्रमुख आणि संबंधितांवरही कारवाई होईल असा इशाराही आता संबंधितांना देण्यात आला आहे.
मराठवाड्यात कॉप्यांचा सुळसुळाट
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कॉपी प्रकरणे समोर आली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान मोठा गैरप्रकार उघडकीस आला.सीसीटीव्ही फुटेज आणि उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे तब्बल १९ जणांविरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
१९ जणांविरुद्ध निलंबनाची प्रक्रिया
या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण १९ जणांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षक आणि संबंधित पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर संस्थात्मक शिस्तभंगात्मक तसेच कायदेशीर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार कारवाईची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने तपास पूर्ण केला आहे.
“कॉपीमुक्त अभियाना” ला धक्का
राज्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी शिक्षण विभागासोबत महसूल, गृह आणि ग्रामविकास विभागाचे सहकार्य घेण्यात येत आहे. नियमित आढावा बैठका घेतल्या जात असतानाही अशा घटना समोर आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देत सरकारने कॉपीप्रकरणी शून्य सहनशीलतेची भूमिका स्पष्ट केली आहे.



















