Times Of Maharashtra Desk : फोनवर बोलण्यास नकार दिला आणि मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील तपनेश्वर भागात घडली. या हल्ल्यात गायत्री तुषार सावंत (वय २६) गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री सावंत (तपनेश्वर गल्ली, जामखेड) ही नृत्यांगना असून ती मैत्रीण मनिषा प्रकाश जावळे हिच्यासोबत राहत होती. आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्याशी तिची मागील पाच वर्षांपासून ओळख होती. मात्र २०२४ पासून दोघांमधील संबंध तुटले होते. यापूर्वीही पीडितेने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
धमकीनंतर पहाटे केला हल्ला
गुरुवार, दि.५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता आरोपीने गायत्रीला फोन करून तू माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. जर तू बोलली नाहीस तर तुला मारून टाकीनअशी धमकी दिली होती. त्यानंतर तिने त्याचा फोन कट केला.यानंतर शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजता आरोपी इमारतीजवळ दबा धरून बसला होता. त्या वेळी गायत्री सावंत तिच्या खोलीत मैत्रीण मनिषासोबत होती. मनिषा बाल्कनीत गेल्याची संधी साधून आरोपीने हातात कोयता घेऊन खोलीत प्रवेश केला आणि गायत्रीच्या बोटांवर, हातावर तसेच डोक्यावर वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली.
आरोपी फरार; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
हल्ल्यानंतर मनिषा जावळे हिने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने शिवीगाळ करत घटनास्थळावरून पळ काढला.या प्रकरणी गायत्री सावंत हिने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात राहुल कचरे याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू आहे.






















