गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. महानायक वसंतरावजी नाईक जयंती उत्सव समिती आणि बीड जिल्हा बंजारा समाजाच्या वतीने गेवराई येथील गजानन लॉन्स, कोल्हेर रोड येथे आयोजित भव्य बंजारा जागृती मेळाव्यात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पत्रकार विनोद नरसाळे यांना प्रदान करण्यात आला.
या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत तथा लेखक प्रा. फुलसिंग जाधव, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळराजे दादा पवार, युवा नेते यशराजभैय्या पंडित, प्रसिद्ध वक्ते संजयभाऊ चव्हाण (सोलापूर), राष्ट्रीय बंजारा महासंघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष तथा वसंतराव नाईक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. पी. टी. चव्हाण, उत्तमभाऊ चव्हाण, अण्णासाहेब राठोड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान विनोद नरसाळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत लोकाभिमुख पत्रकारितेची परंपरा जपली आहे. प्रशासनातील त्रुटी, सामाजिक प्रश्न, विकासकामे, शिक्षण, आरोग्य, शेती, पाणीटंचाई तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन समस्यांवर त्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण आणि निर्भीड वृत्तांकन केले आहे.
शोध पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे विषय उजेडात आणत संबंधित यंत्रणांना दखल घेण्यास भाग पाडण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची पत्रकारितेतील निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या भूमिकेची दखल घेत त्यांना यापूर्वीही जिल्हा व मराठवाडा स्तरावरील विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले असून याच समाजाभिमुख पत्रकारितेची दखल घेऊन त्यांना महानायक वसंतरावजी नाईक जयंती उत्सव समिती व बीड जिल्हा बंजारा समाजाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर करण्यात आला होता. रविवार दि.२६ रोजी भव्य आयोजित कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांकडून त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. या सन्मानानंतर पत्रकार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विनोद नरसाळे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जनतेच्या प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठविणाऱ्या पत्रकारितेचा हा सन्मान असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.






















