Times Of Maharashtra Desk : भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या हत्येचा कट रचण्यात आला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या कटामागे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील मास्टरमाईंड असू शकतात, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना आधीच मिळाल्याने गेल्या तीन दिवसांपासून माळशिरस तालुक्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून काही व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
माध्यमांशी बोलताना राम सातपुते म्हणाले की, निवडणूक काळातच गुप्तचर यंत्रणा आणि जिल्हा पोलिसांना संशयास्पद माहिती मिळाली होती. बाहेरच्या टोळीमार्फत कॉन्ट्रॅक्ट किलिंग करण्याचा कट असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना आपण लेखी माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. पोलिसांकडून संशयितांचे आर्थिक व्यवहार, बँक डिटेल्स तपासले जात असून तपास वेगाने सुरू आहे.
राम सातपुते यांनी स्पष्ट केले की, आपण संविधानिक मार्गाने राजकारण करणारा नेता असून धमकीची व ठोकशाहीची भाषा दुर्दैवी आहे. भविष्यात माझ्या जीवाला काही झाले, तर यासंबंधीची माहिती मी वरिष्ठ पातळीवर दिली आहे. पुढील सत्य पोलिस तपासातून समोर येईल, असेही त्यांनी नमूद केले.
सध्या हे सर्व आरोप तपासाधीन असून अंतिम निष्कर्ष पोलिस चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.






















