Times Of Maharashtra Desk : भाषिक व राजकीय मुद्द्यांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संघसरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सुरू झालेल्या वादात आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी थेट माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोश्यारी यांनी राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरतात, असा उपरोधिक टोला लगावल्यानंतर संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले, ज्याला स्वतः धोतर नीट नेसता येत नाही, तो महाराष्ट्राला आणि ठाकरेंना अक्कल शिकवतोय. मोदींना कोण घाबरतंय? सत्तेच्या जोरावर आणि तपास यंत्रणांच्या आधारावर बोलणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावं, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
राऊत पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पद्मभूषण दिलं जातं, हे दुर्दैव आहे. हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार नाही. ज्यांनी असा सन्मान दिला असता, त्यांना बाळासाहेबांनी जोड्याने मारले असते, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी याआधी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे हे आपल्याला लहान भावासारखे असल्याचे सांगत, संघाच्या कार्यक्रमाला आलेले लोक मोदींना घाबरून आले नव्हते. राज ठाकरे यांनीही मोदींना घाबरू नये, त्यांच्या जवळ जावे. मोदींसाठी सर्व जनता समान आहे, असे विधान केले होते.
या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, कोश्यारींच्या भूमिकेवरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.






















