मुंबईसारख्या महानगराची लाइफलाइन समजली जाणारी लोकल ट्रेन गर्दीमुळे आज डेथलाइन ठरते आहे. दररोज लाखो प्रवासी याच लोकलवर अवलंबून असतात. मात्र लोकलच्या अपुऱ्या फेऱ्या, गाड्यांची मर्यादित संख्या आणि व्यवस्थेतील अकार्यक्षमता यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. स्थानिक प्रवाशांकडून गाड्यांची संख्या वाढवण्याची सातत्याने मागणी होत असतानाही रेल्वे प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप होत आहे.
Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇
या भीषण अपघातावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. दिल्लीत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी असताना पत्रकारांनी त्यांना या दुर्घटनेबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की, “रेल्वे मंत्रालयाने यावर पत्रक काढलं आहे, त्यामुळे यावर जास्त बोलण्याची गरज नाही.” विशेष म्हणजे, सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारे वैष्णव यांनी या अपघाताबाबत कोणतीही पोस्ट, श्रद्धांजली किंवा शोकप्रकट केला नाही, यावरून त्यांच्या भूमिकेवर टीका होत आहे.
दरम्यान, राज्य सरकारने अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मुंबईकरांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, “कधी रेल्वे प्रशासन जागं होणार?” असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गर्दीत लटकून प्रवास करणं ही मजबुरी असून, ती शोकांतिका ठरू नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज अधिकच तीव्र झाली आहे.























