Times Of Maharashtra Desk : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून लाच घेताना एका लिपिकाला रंगेहात अटक करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात थेट छापा टाकत संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. या कारवाईनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
कारकुनास रंगेहात पकडले
या प्रकरणात कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंग (उर्फ राजू ढेरिंगे) याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यापैकी ३५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीने त्याला रंगेहात पकडले. कारवाईनंतर संबंधित कार्यालय सील करण्यात आले असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
तर राजीनामा देईन
दरम्यान, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना या प्रकरणात माझा कोणताही संबंध आढळल्यास मी तात्काळ राजीनामा देईनअशी स्पष्ट भूमिका मांडली. निष्पक्ष चौकशीला आपण पूर्ण सहकार्य करूअसेही त्यांनी सांगितले.
मात्र विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्यातील विविध विभागांत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत, झिरवाळ हे आदिवासी असल्यानेच त्यांच्या कार्यालयावर कारवाई झाल्याचा दावा केला. शासनाच्या प्रत्येक विभागात पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही,असेही त्यांनी म्हटले.
विरोधकांची राजीनाम्याची मागणी
तसेच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्याचे उघड झाल्याने निष्पक्ष चौकशीसाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या लिपिकाला न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत एसीबी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, याची चौकशी करायची असल्याची माहिती एसीबीने न्यायालयात दिली. चौकशीदरम्यान संबंधित कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे कथितपणे सांगितल्याची माहिती समोर येत असून, त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
या घटनेमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, येत्या काळात या प्रकरणाचे पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















