ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी कु. दुर्वा मनोज गायकवाड हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शहरी सर्वसाधारण प्रवर्गातून दुर्वाने चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड निर्माण केला आहे.
दुर्वाच्या या यशामुळे ब्रह्मपुरीसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात तिचे कौतुक होत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही सातत्यपूर्ण अभ्यास, नियमित सराव आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर तिने हे यश मिळवले.
आपल्या यशाचे श्रेय दुर्वाने आजोबा उमेश नाळे, संभाजीराव खोचरे आणि आजी गीता खोचरे यांच्या विशेष मार्गदर्शनाला दिले आहे. तसेच शाळेतील शिक्षकांनी वर्गात घेतलेली नियमित तयारी, सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सातत्यपूर्ण सराव आणि पालकांनी दिलेले प्रोत्साहन यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो, असे दुर्वाने सांगितले.
शिष्यवृत्ती परीक्षेतील तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेचे नाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात उंचावले आहे. तिच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दुर्वाचे अभिनंदन केले असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दुर्वाच्या यशातून ग्रामीण आणि शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्तेची मोठी क्षमता असल्याचे अधोरेखित झाले आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांसाठी सातत्याने अभ्यास करण्याची प्रेरणा मिळणार आहे.






















