दौड:(प्रतिनिधी मयुर साळवे,संघराज गायकवाड) गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना १० ऑगस्ट रोजी घडली. या घटनेत तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य तीन विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी केली आहे.
कांबळे यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांकडे निवेदन सादर केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थिनी झोपल्या असताना पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला. उपचारादरम्यान त्यापैकी तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रसारमाध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींच्या निवासासाठी पलंगांसह काही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित आश्रमशाळेतील सुरक्षा आणि निवास व्यवस्थेची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच जखमी विद्यार्थिनींना शासनाच्या माध्यमातून सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील सर्व अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या निवास, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक ठिकाणी शासकीय निधीतून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही महासंघाने केली आहे.
यावेळी महासंघाचे राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य सल्लागार दिगंबर काळे आणि राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे उपस्थित होते.























