जामनेर:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर एसटी आगाराच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना सोमवारी (ता. १०) पहाटे उघडकीस आली. आगाराच्या आवारात उभी असलेली नवीन एसटी बस चक्क पळवून नेण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, चोरीला गेलेली बस जामनेर शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या शहापूर गावाजवळ सोडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास आगारातील बस बाहेर नेण्यात आली. काही अंतरावर गेल्यानंतर बस शहापूर गावाजवळ सोडण्यात आली. बस तेथे आढळून आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
या घटनेनंतर जामनेर एसटी आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आगाराच्या आवारातून मोठी आणि नवीन बस बाहेर नेण्यात आली असताना सुरक्षा यंत्रणेला याची माहिती कशी मिळाली नाही? मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा तपासणी झाली होती का? रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची ड्युटी नेमकी कशी होती? तसेच आगारातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
या प्रकरणाच्या तपासात आगारातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. बस कोणत्या वेळी आगारातून बाहेर पडली, ती कोणत्या मार्गाने शहापूरकडे नेण्यात आली आणि त्या वेळी परिसरात कोणाची हालचाल होती, याचा तपास फुटेजच्या आधारे होऊ शकतो.
बस शहापूरजवळ नेऊन सोडण्यामागे नेमका काय उद्देश होता, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरत आहे. बस चोरी करण्यामागे कोणाचा सहभाग होता आणि हा प्रकार नेमका कशासाठी करण्यात आला, याचा उलगडा तपासातून होणे अपेक्षित आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जामनेर एसटी आगाराच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करण्याची मागणी होत आहे. आगारातून शासकीय मालमत्ता बाहेर जाताना अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था आणि तपासणीची आवश्यकता असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
शासकीय मालकीची नवीन बस आगारातून बाहेर नेण्यात आलीच कशी, याचे उत्तर आता तपास यंत्रणेला शोधावे लागणार आहे. सुरक्षा व्यवस्थेत निष्काळजीपणा किंवा त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कारवाई होणार का, याकडे जामनेरकरांचे लक्ष लागले आहे.






















