गेवराई:(प्रतिनिधी विष्णू गायकवाड) गेवराईच्या नव्या तहसीलदार म्हणून गीतांजली गरड यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला. राक्षसभुवन येथील चर्चेत असलेल्या वाळू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाची जबाबदारी स्वीकारताच गरड यांनी तालुक्यातील अवैध वाळू उपसा, तस्करी आणि तहसील कार्यालयातील एजंटशाहीला आळा घालण्याचे संकेत दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथून बदली होऊन आलेल्या गीतांजली गरड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनातील प्रलंबित कामे, नागरिकांच्या तक्रारी आणि महसूल विभागातील कामकाजाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि कामाचा वेग वाढवणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
‘एसआयआर’चे राष्ट्रीय कर्तव्य वेळेत पूर्ण करण्यासोबतच महसूल दप्तरी प्रलंबित असलेली सामान्य नागरिकांची कामे तातडीने मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांना अनावश्यक विलंब किंवा मध्यस्थांच्या माध्यमातून कामे करून घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी कार्यालयीन कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता राखण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.
गेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन अवैध वाळू उपशावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे संकेत तहसीलदार गरड यांनी दिले.
ज्या भागात अवैध वाळू उपसा आढळून येईल, त्या ठिकाणच्या संबंधित महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नव्या तहसीलदारांच्या आक्रमक कार्यपद्धतीमुळे महसूल प्रशासनात शिस्त निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, त्यांच्या पुढील कारवाईकडे गेवराईकरांचे लक्ष लागले आहे.






















