विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी ) : भारताच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे भेट देत श्रींच्या पवित्र समाधीचे दर्शन घेतले. राष्ट्रपतींच्या या भेटीमुळे शेगाव नगरीत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला.
राष्ट्रपतींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग तसेच विशेष सुरक्षा पथकाच्या देखरेखीखाली संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला होता. मंदिर परिसर स्वच्छ व आकर्षक सजावटीने नटला होता. भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

राष्ट्रपती मुर्मू यांचे मंदिर प्रशासन आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी समाधीस्थळी जाऊन श्रींच्या चरणी पुष्प अर्पण केले.
समाधीसमोर काही काळ ध्यानस्थ राहून राष्ट्रपतींनी देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच देशात शांतता, ऐक्य आणि बंधुता नांदावी यासाठी प्रार्थना केली. मंदिरातील पुजाऱ्यांनी विधिवत पूजा-अर्चा करून त्यांना प्रसाद दिला.
राष्ट्रपतींच्या भेटीमुळे शेगाव शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक नागरिक आणि भाविकांनी हा क्षण ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त केली. विशेष म्हणजे, इतिहासात प्रथमच विद्यमान राष्ट्रपतींनी शेगाव येथे येऊन श्रींचे दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे.
या भेटीदरम्यान स्थानिक प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, संस्थानचे विश्वस्त, तसेच मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या आगमनामुळे शेगावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रपतींच्या या पवित्र भेटीने श्री गजानन महाराजांच्या भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, शेगाव नगरीसाठी हा दिवस संस्मरणीय ठरला आहे.






















