पुणे : गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), महाराष्ट्र राज्य, पुणे येथील अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होऊनही संबंधित कर्मचारी अद्याप मूळ ठिकाणीच कार्यरत असल्याचे समोर आल्याने विभागातील प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बदली आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची चर्चा पोलीस दलात रंगू लागली असून, नव्याने बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, अपर पोलीस अधीक्षक क्रांती पवार यांनी मे २०२६ च्या अखेरच्या आठवड्यात बदलीस पात्र असलेल्या अनेक पोलीस शिपाई, हवालदार व इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. मात्र, आदेशानंतरही काही कर्मचारी अद्याप कार्यमुक्त न झाल्याने ते पूर्वीच्या शाखांमध्येच कामकाज सांभाळत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अपर पोलीस अधीक्षकांच्या आदेशांचे पालन होत नसल्याचा आरोप केला जात आहे.
गुन्हे अन्वेषण विभागात काही कर्मचारी गेल्या १० ते १५ वर्षांपासून एकाच कार्यालयात कार्यरत असल्याची चर्चा असून, नियमानुसार ठराविक कालावधीनंतर होणाऱ्या बदली प्रक्रियेची अंमलबजावणी नेमकी कितपत होते, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पाच वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा नियम असताना तो सर्वांवर समानपणे लागू केला जातो का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुणे शहरासह विविध ठिकाणांहून नुकतेच गुन्हे अन्वेषण विभागात बदली होऊन आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची निवड मुलाखत व टायपिंग चाचणीच्या आधारे करण्यात आली आहे. मात्र, संबंधित जागांवरील कर्मचारी अद्याप कार्यमुक्त न झाल्याने नव्याने आलेल्या कर्मचाऱ्यांना जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे बोलले जात आहे.
विभागातील काही कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याने त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे बदली आदेशांची अंमलबजावणी समान निकषांवर होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आदेश असूनही अंमलबजावणी होत नसल्याने विभागातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बदली आदेश लागू झाल्यानंतर नव्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई तसेच वेतन कपातीची तरतूद असताना काही प्रकरणांत नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आदेशांची अंमलबजावणी टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करून त्यांना नव्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्याची मागणी विभागातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
मे महिन्यात बदली आदेश निघूनही अनेक कर्मचारी अद्याप मूळ ठिकाणीच असल्याने अपर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विभागातील कर्मचाऱ्यांमधून आता याबाबत आवाज उठू लागला असून, वरिष्ठ पातळीवर हस्तक्षेप करून प्रशासनात सुसूत्रता आणण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित झाले होते. काही संवेदनशील प्रकरणांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे आता बदली आदेशांच्या अंमलबजावणीचा मुद्दाही चर्चेचा विषय ठरत आहे.
या प्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, त्यांची बाजू मिळाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल.






















