गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गावागावांत जनजागृती करत पालकांशी थेट संवाद साधून विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यावर भर दिला जात आहे.
या उपक्रमांतर्गत अधिकारी व शिक्षक वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन पालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहेत. विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना प्रवेशासाठी प्रोत्साहन दिले जात असून विविध जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत.

नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात करण्यासाठी विशेष उपक्रम आखण्यात आले आहेत. बैलगाडीतून मिरवणूक काढून प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि बूट देऊन पालकांवरील आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शाळांमध्ये स्वच्छ वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, क्रीडा साहित्य आणि शैक्षणिक साधनांची उपलब्धता वाढवली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व आनंददायी वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांबद्दल पालकांचा विश्वास वाढेल आणि शासकीय शाळांकडे पुन्हा कल वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मध्यान्ह भोजन योजना, शिष्यवृत्ती, डिजिटल शिक्षण आणि ई-लर्निंग सुविधा यांचाही लाभ विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या उपक्रमातून तालुक्यात व्यापक जनजागृती होत असून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे.






















