सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी वितरिकांची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना खासदार राजाभाऊ वाजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कालव्याच्या अपूर्ण कामांबाबत निवेदन दिल्यानंतर खासदार वाजे यांनी उर्ध्व प्रवरा निळवंडे कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता हापसे यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा सादर केला. धरणात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही वितरिकांची कामे अपूर्ण असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याची गंभीर बाब बैठकीत मांडण्यात आली.

खासदार वाजे यांनी सांगितले की, आमदार असताना त्यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. २०२१ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, अद्यापही काही कामे रखडलेली आहेत. त्यामुळे कोणतीही दिरंगाई न करता उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून पुढील आवर्तनात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
बैठकीनंतर खासदार वाजे यांनी शेतकऱ्यांसमवेत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.






















