जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांना जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने तसेच सरसकट देण्यासंदर्भात शासनाने तातडीने परिपत्रक जारी करावे, या प्रमुख मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने दि. १६ जून २०२६ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई येथे तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आदिवासी मंत्री यांच्या उपस्थितीत कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार मा. श्री. रमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. मात्र, अद्याप संबंधित शासन परिपत्रक जारी न झाल्याने समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच संदर्भात दि. २ जून २०२६ रोजी मुंबई येथे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्मरणपत्र देण्यात आले होते. तरीही निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याने कोळी महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे.
कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार मा. श्री. रमेश दादा पाटील तसेच युवा प्रदेश अध्यक्ष अँड. चेतन दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
दि. १६ जून रोजी दुपारी १२ वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करून मा. जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात येणार आहे.






















