पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तपासाला रविवारी नवे वळण मिळाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी गुन्ह्याची पुनर्रचना (क्राइम सीन रीकन्स्ट्रक्शन) करत संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी केली. या वेळी आरोपी सिया गोयल हिने कथितपणे सहआरोपी चेतन चौधरीला खाली बसून संकेत देण्याची योजना आखली होती, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून सुमारे ४०० फूट खोल दरीत पडून २६ वर्षीय केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात मानला जात असला, तरी तपासादरम्यान हा पूर्वनियोजित खून असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात सिया गोयल (२०) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी (२२) यांना अटक करण्यात आली असून, दोघांवरील आरोपांची न्यायालयीन सुनावणी अद्याप झालेली नाही.
रविवारी सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात घटनास्थळी पुनर्रचना करण्यात आली. केतनच्या उंची व वजनाशी साधर्म्य असलेला डमी वापरून घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले की, आरोपींनी घेतलेला मार्ग, उभे राहण्याची जागा आणि कथित घटनेचा क्रम तपासण्यात आला असून, सहआरोपी चेतन चौधरीसोबतही अशीच पुनर्रचना करण्यात येणार आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सिया गोयलने पाणी पिण्याचा किंवा बुटाची लेस बांधण्याचा बहाणा करून खाली बसण्याचा इशारा देण्याचे ठरवले होते. हा इशारा मिळताच चेतन चौधरीने मागून येऊन बेसावध असलेल्या केतनला दरीत ढकलण्याचा कथित कट होता, असा पोलिसांचा दावा आहे. तसेच, केतनने पडताना सियाला पकडू नये आणि तिची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी हा संकेत ठरवण्यात आल्याचेही तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान चेतन चौधरीच्या हालचालींबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. टोल नाक्यांवरील नोंदी टाळण्यासाठी त्याने कारऐवजी स्कूटरने सुमारे ९० किलोमीटरचा प्रवास केल्याचा दावा पोलिसांनी केला असून, संबंधित स्कूटर जप्त करण्यात आली आहे. किल्ल्यावर चढताना हुडी परिधान करून नंतर काळा टी-शर्ट घालणे आणि परतताना पुन्हा हुडी घालून ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याचाही संशय तपास यंत्रणेला आहे.
दरम्यान, आरोपींनी यापूर्वी लोहगड परिसरात संभाव्य घटनास्थळाची पाहणी करून कटाचा सराव केल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भातील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी संपत असून, पुढील तपासासाठी त्यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयाकडे केली जाण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, सिया गोयलला केतनशी विवाह करायचा नव्हता; मात्र साखरपुडा मोडल्यास कौटुंबिक वाद निर्माण होतील, या भीतीतून हा कथित कट रचण्यात आला.
मात्र, आरोपी सियाचे वकील अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी पोलिस कोठडीत दिलेल्या कथित कबुलीजबाबाला न्यायालयीन प्रक्रियेत पुराव्याचे मूल्य नसल्याचे सांगितले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र व ठोस पुराव्यांच्या आधारेच आरोप सिद्ध करावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या पोलिस साक्षीदारांचे जबाब, डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि कथित कटाशी संबंधित इतर बाबींचा सखोल तपास करत असून, केतन अग्रवाल यांच्या मृत्यूमागील संपूर्ण सत्य उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.






















