Times of Maharashtra Desk: देशातील सर्वात मोठी महापालिका असलेली मुंबई पुन्हा एकदा जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सक्रिय झाले असून शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन्ही पक्षांची युती होणार असून त्याची अधिकृत घोषणा बुधवारी केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उत्तर भारतीय मतदारांचा कल भाजपकडे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आपल्या बाजूने कसे वळवता येतील, यासाठी ठाकरे बंधूंना ठोस रणनीती आखावी लागणार आहे.
महाविकास आघाडीबाबत अद्याप अस्पष्टता.
ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी ही युती महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार की स्वतंत्रपणे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. काँग्रेसने आधीच एकटे लढण्याची घोषणा केल्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांची बेगमी करणे हे ठाकरे बंधूंसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
ठाकरे बंधूंसमोरील प्रमुख आव्हाने
बंडखोरी रोखणे : ज्या प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद आहे आणि जिथे उमेदवारीवरून दावा आहे, तिथे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सोबत ठेवत बंडखोरी टाळावी लागणार आहे.
मराठी मतदारांचे एकत्रीकरण : मराठी बहुल प्रभागांमध्ये अधिकाधिक मराठी मतदार आपल्या बाजूने कसे वळतील, यासाठी विशेष लक्ष द्यावे लागेल. मराठी मतदार महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाकडे मोठ्या प्रमाणात जाणार नाहीत, यासाठीची रणनीती महत्त्वाची ठरणार आहे.
दलित आणि मुस्लिम मतदार : काँग्रेस सोबत नसल्यामुळे दलित आणि मुस्लिम मतदारांची विभागणी होण्याची शक्यता आहे. याचा फटका ठाकरे बंधूंच्या युतीला बसू नये, यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी राजकीय गणित मांडावे लागणार आहे.
मित्र पक्षांना स्थान : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या मित्र पक्षाला सन्मानजनक जागा देऊन त्यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारीही युतीवर असेल.
उत्तर भारतीय मतदारांचे गणित : महायुतीत विशेषतः भाजपकडे असलेली उत्तर भारतीय मतदारांची ताकद लक्षात घेता, ही मतं आपल्या बाजूने वळवायची की त्याविरोधात मराठी मतदारांचे एकत्रीकरण करायचे, यावर स्पष्ट रणनीती ठरवावी लागेल.
एकवाक्यता आणि वचननामा : महापालिका निवडणुकीसाठी मुद्दे ठरवताना आणि संयुक्त वचननामा जाहीर करताना दोन्ही पक्षांच्या नेतृत्वामध्ये एकवाक्यता राखणे व ती प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवणे हेही मोठे आव्हान असणार आहे.
एकंदरीत, मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती चर्चेत असली तरी राजकीय समीकरणे, मतदारांचे विभाजन आणि स्थानिक पातळीवरील आव्हाने यांचा सामना करतच त्यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरावे लागणार आहे.






















