Time of Maharashtra Desk: मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली दिसत आहे. ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर जाहीर झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ही युती बुधवारी वरळीतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अधिकृतरीत्या घोषित करण्यात आली.
या ऐतिहासिक क्षणा आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. या दृश्याने कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.
“ज्यांचं महाराष्ट्रावर आणि मुंबईवर प्रेम आहे, त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं.” – राज ठाकरे यांची ठाम घोषणा
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “शिवसेना–मनसेची युती झाली आहे, हे मी अधिकृतपणे जाहीर करतो.” माझ्या एका मुलाखतीतील ‘महाराष्ट्र कोणत्याही भांडणापेक्षा मोठा आहे’ या विधानातूनच या युतीची सुरुवात झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी मिश्किल टोला लगावत सांगितले की, “सध्या राजकारणात मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत, त्यामुळे उमेदवारीबाबत योग्य वेळी माहिती दिली जाईल.त्यानंतर ” राज ठाकरे यांनी जनतेला थेट आवाहन करत सांगितले,“ज्यांचं महाराष्ट्रावर आणि मुंबईवर प्रेम आहे, त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं.”
तसंच त्यांनी ठामपणे सांगितले की, “मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असेल.”
“भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत. आता आम्ही भांडत राहिलो, तर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान होईल.” – उद्धव ठाकरे यांचा आक्रमक इशारा
यावेळी उद्धव ठाकरे यांनीही जोरदार भाषण करत भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. “भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत. आता आम्ही भांडत राहिलो, तर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान होईल.” म्हणून ही युती कर्तव्य आणि कायमस्वरूपी एकत्र राहण्यासाठी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “मुंबई किंवा महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहील, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
मराठी माणसाला उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, “आता चुकाल तर संपल. मराठीचा वसा टाकू नका.”
सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार
ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे मुंबईसह सात महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे युग’ पुन्हा जोरात परतल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता मुंबई आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ही युती किती निर्णायक ठरणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.






















