Times Of Maharashtra Desk : चाकणमधील मालवाहतुकीच्या व्यवसायाला धक्का देणारी एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. पिकअप गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या तरुणाने मालकाचा विश्वासघात करत सुमारे दीड लाख रुपयांच्या मालाचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सोनल बलभीम अरडे (वय ३१, रा. चाकण) यांच्या बोलेरो पिकअप गाडीवर इरफान अन्सारी (वय २६, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा चालक म्हणून कार्यरत होता. ९ फेब्रुवारी रोजी गाडीत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे लोखंडी सुटे भाग (पार्ट्स) भरून ते मोशी येथून नऱ्हे येथील एका खासगी कंपनीत पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती.
मात्र, संबंधित कंपनीकडे माल वेळेत न पोहोचल्याने मालकांनी चौकशी सुरू केली. तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघडकीस आली. आरोपी इरफान अन्सारी याने माल नऱ्हे येथे पोहोचवण्याऐवजी वाटेतच लोखंडी सुटे भागांची परस्पर विक्री केली आणि त्यातून मिळालेली रक्कम स्वतःकडे ठेवली.
चोरी उघड होऊ नये म्हणून त्याने बोलेरो पिकअप गाडी नवी मुंबई विमानतळ परिसरात बेवारस अवस्थेत सोडून दिली आणि तेथून फरार झाला. घटनेनंतर मालकांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, त्याच्याविरुद्ध विश्वासघात व अपहाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे औद्योगिक भागातील मालवाहतूक व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






















