पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत शासकीय आश्रम शाळांनी बारावी विज्ञान शाखेत उल्लेखनीय यश संपादन करत आदिवासी भागातील शिक्षणाची प्रगती पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर उत्कृष्ट निकाल नोंदवला आहे.
या निकालात पियुष मंगल तुंबडा (७२.६७ टक्के) यांनी प्रथम क्रमांक मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. ते शासकीय आश्रम शाळा, गुहिर येथील विद्यार्थी असून त्यांच्या यशाने परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. द्वितीय क्रमांक नकुल बारकू दिधा (७२.१७ टक्के) (शासकीय आश्रम शाळा, गोदे) यांनी मिळवला, तर सालिविका आनंद जाधव (६५.५० टक्के) (शासकीय आश्रम शाळा, भोपाली) यांनी तृतीय स्थान पटकावले.
याशिवाय ऋषिता देवराम टोपले (६५ टक्के) (सुतारमाळ) आणि दिपाली सखाराम मोळे (६२.५० टक्के) (पळसुंडे) यांनीही उल्लेखनीय यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे आदिवासी विकास विभाग आणि प्रकल्प कार्यालय, जव्हार यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या निकालामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.






















