जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ जाहीर केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला आहे. नव्या निर्णयानुसार पेट्रोल प्रति लिटर ₹10 तर डिझेल ₹12.50 ने महाग झाले असून ही दरवाढ तत्काळ लागू करण्यात आली आहे.
सरकारच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे सार्वजनिक तेल कंपन्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. पेट्रोल व डिझेल विक्रीत तोटा सहन करावा लागत असल्याने ही दरवाढ आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या निर्णयामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होणार आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही फटका बसणार आहे.
दरम्यान, निवडणुका संपल्यानंतरच दरवाढ जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नागरिकांकडून या निर्णयावर नाराजी व्यक्त होत असून सरकारने दरवाढीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.






















