गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन महसूल प्रशासन हे शासन आणि नागरिक यांच्यामधील सर्वात महत्त्वाचा दुवा असून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न तातडीने सोडविणे ही महसूल यंत्रणेची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेषतः शेतरस्ते हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी आणि शेतीशी थेट निगडित असल्याने अडविलेले वादग्रस्त रस्ते प्राधान्याने मोकळे करावेत, तसेच ग्रामीण नागरिकांशी सौजन्याने व संवेदनशीलतेने वागावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.
तहसील कार्यालय बीड येथे शुक्रवारी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी महसूल विभागाच्या विविध कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची असून अनेक ठिकाणी शेतरस्त्यांअभावी नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये विलंब न करता कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून रस्ते मोकळे करण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच शेतकरी हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असून त्याच्या प्रश्नांकडे केवळ महसुली विषय म्हणून न पाहता मानवी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीच्या प्रारंभी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे स्वागत करून बीड तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध महसुली उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान”, अतिक्रमणमुक्त शेतरस्ते मोहीम, महसूल सेवा शिबिरे, फेरफार निपटारा, डिजिटल सेवा वितरण, नैसर्गिक आपत्ती पंचनामे तसेच शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांबाबत त्यांनी माहिती सादर केली. तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी आढावा दिला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना नागरिकाभिमुख प्रशासनाची जाणीव करून देत आपल्या मुख्यालयात आणि कार्यालयात अधिकाधिक वेळ उपलब्ध राहण्याचे निर्देश दिले. महसूल सेवा घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अनावश्यक हेलपाटे मारावे लागू नयेत, अर्जदारांना वेळेत सेवा मिळावी आणि प्रत्येक प्रकरणाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक हे प्रशासनाकडे अपेक्षेने पाहत असतात. त्यामुळे त्यांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी महसूल यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, महसूल वसुली, फेरफार प्रकरणे, ई-अभिलेख, नागरिक सेवा, संजय गांधी निराधार योजना, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर महसुली कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शासनाच्या विविध योजना आणि सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांच्या अर्जांचा वेळेत निपटारा, कार्यालयीन शिस्त आणि सेवा वितरणाची गुणवत्ता यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीनंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तहसील कार्यालयाच्या विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये संजय गांधी विभागातील कामकाजाची माहिती घेतली, लाभार्थी प्रकरणांचा आढावा घेतला तसेच प्रलंबित प्रस्तावांबाबत सूचना केल्या. त्याचबरोबर गौण खनिज विभागातील संचिकांची तपासणी करून महसुली कार्यवाही, दंड वसुली आणि अनधिकृत उत्खननासंदर्भातील प्रकरणांचा आढावा घेतला. कार्यालयीन कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि परिणामकारक करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीस तहसीलदार चंद्रकांत शेळके, तहसीलदार सुरेंद्र डोके, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, संभाजी थोटे, अण्णासाहेब वंजारे, प्रशांत सुपेकर उपस्थित होते. तसेच सहाय्यक महसूल अधिकारी महादेव चौरे, राहुल कसबे, वामन तोगरगे यांच्यासह मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल कर्मचारी संघटना तसेच मंडळ अधिकारी-तलाठी संघटनेच्या वतीनेही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
बैठकीच्या शेवटी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी आभार प्रदर्शन केले. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी महसूल प्रशासनाने केवळ कागदोपत्री कामकाज न करता प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, शेतकऱ्यांशी संवाद साधावा आणि शासनाच्या लोकाभिमुख धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले. शेतकरी, नागरिक आणि प्रशासन यांच्यात विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक महसूल कर्मचाऱ्याने उत्तरदायित्वाने काम करावे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.






















