ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी समोर आली आहे. ब्रह्मपुरी पोलिसांनी शहरात राबवलेल्या एका विशेष मोहिमेदरम्यान तब्बल १८ अल्पवयीन मुलांना वाहनांसह रंगेहात पकडले. मात्र, या कारवाईत केवळ दंड ठोकून विषय संपवण्याऐवजी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी अत्यंत जबाबदार आणि संवेदनशील अधिकाऱ्याची भूमिका बजावत सर्व पालकांना पोलीस ठाण्यात बोलावले.
गेल्या काही दिवसांपासून ब्रह्मपुरी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अल्पवयीन मुलांकडून बेदरकारपणे आणि विनापरवाना वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते, तसेच अपघातांचा धोकाही कमालीचा वाढला होता. या वाढत्या त्रासाची दखल घेत पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरातील विविध चौकांत विशेष तपासणी मोहीम सुरू केली. या मोहिमेत पोलिसांनी विनापरवाना आणि कमी वयात भरधाव गाडी चालवणाऱ्या १८ मुलांना वाहनांसह ताब्यात घेतले आणि त्यांची वाहने जप्त केली.
कारवाईनंतर नेहमीप्रमाणे केवळ दंडात्मक पावती फाडून मुलांना सोडण्यात आले नाही. पोलीस निरीक्षक बानबले यांनी या सर्व १८ मुलांच्या पालकांना तात्काळ पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले. पोलीस ठाण्यात जमलेल्या सर्व पालकांना आणि मुलांना समोर बसवून त्यांनी कायदेशीर तरतुदी आणि अपघातांचे गंभीर धोके समजावून सांगितले.
यावेळी पालकांशी संवाद साधताना पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले म्हणाले, “अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणे म्हणजे त्यांच्या आणि रस्त्यावरील निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. पाल्यांच्या हट्टापायी किंवा समाजात प्रतिष्ठा दाखवण्यासाठी त्यांना वाहने देऊ नका. अपघात झाल्यास केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण आयुष्याचा थरकाप उडतो.” त्यांच्या या समुपदेशनामुळे अनेक पालकांचे डोळे पाणावले.
नवीन मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांवर कडक कारवाईची तरतूद आहे, याची जाणीव पोलिसांनी करून दिली. “आज आम्ही तुम्हाला केवळ समज देऊन आणि समुपदेशन करून सोडत आहोत. परंतु, भविष्यात जर हेच मुले पुन्हा रस्त्यावर विनापरवाना गाडी चालवताना आढळली, तर गाड्या तर जप्त होतीलच, शिवाय संबंधित पालकांवर थेट कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल,” असा इशाराही बानबले यांनी दिला. यानंतर सर्व पालकांकडून ‘यापुढे मुलांना गाडी देणार नाही’ असे सांगण्यात आले.
ब्रह्मपुरी पोलिसांच्या या अनोख्या आणि संवेदनशील भूमिकेचे शहरात जोरदार स्वागत होत आहे. केवळ दंडाची कारवाई करून सरकारी तिजोरी भरणे हा पोलिसांचा उद्देश नसून, समाजातील तरुण पिढी सुरक्षित राहावी हा यामागचा शुद्ध हेतू होता, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील बेशिस्त आणि अल्पवयीन वाहन चालकांना चांगलाच चाप बसणार असल्याचे चित्र आहे.






















