जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची रक्कम १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी, या मागणीसाठी आज माननीय तहसीलदार, जामनेर यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
बेटावद बु. व बेटावद खु. परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून अनुदान वितरणाला गती देण्याची मागणी केली. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे अनुदानाची रक्कम तातडीने खात्यावर जमा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत असल्याचे तहसीलदारांचे स्पष्टीकरण
यावेळी तहसीलदारांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधताना सांगितले की, अतिवृष्टी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा व्हावी यासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे यापूर्वीच पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
तसेच आज देण्यात आलेल्या निवेदनाचे पत्रदेखील सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली. अनुदान वितरणाच्या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे अनुदान मिळण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
१४ ऑगस्टपर्यंत अनुदान न मिळाल्यास १५ ऑगस्टला आंदोलन
दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. १४ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही, तर १५ ऑगस्ट रोजी कांग नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना वारंवार आश्वासने मिळत असली तरी प्रत्यक्षात अनुदानाची रक्कम खात्यावर जमा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची तातडीने गरज असल्याचे यावेळी शेतकरी बांधवांनी सांगितले.
प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम कोणत्याही परिस्थितीत विलंब न करता जमा करावी, तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
निवेदनाच्या वेळी बेटावद बु. आणि बेटावद खु. येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात येणाऱ्या पत्रव्यवहारानंतर अनुदान वितरणाची प्रक्रिया कितपत वेग घेते आणि १४ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष रक्कम जमा होते का, याकडे बेटावद परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.






















