ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रम्हपुरी परिसरातील इथेनॉल प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे स्थानिकांना त्वचारोग, अंगाला खाज सुटणे आणि पुरळ उठणे यांसारखे संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरत असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ या दैनिकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने जिल्हा आरोग्य यंत्रणेला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केलेल्या शासकीय सर्वेक्षणात तब्बल १९८ नागरिक विविध चर्मरोगांनी ग्रस्त असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चंद्रपूरचे उप-प्रादेशिक अधिकारी सुशीलकुमार साहेबराव राठोड यांनी १६ जुलै २०२६ रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने अहवाल मागवला होता. हे क्षेत्र आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच १७ जुलै रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ब्रह्मपुरी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचे आदेश दिले. त्यानंतर १७ जुलै ते २१ जुलै २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत वैद्यकीय चमूने बाधित ५ गावे आणि २ वॉर्डांमध्ये घरोघरी जाऊन सखोल सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा अधिकृत अहवाल आता समोर आला आहे.
वैद्यकीय पथकाने सादर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, चर्मरोगाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे.
पेठ वॉर्ड: ६२ रुग्ण फुलेनगर वॉर्ड: ५८ रुग्ण उदापूर: २२ रुग्ण पराडगाव: १७ रुग्ण बोरगाव: १६ रुग्ण झिलबोडी: १६ रुग्ण परसोडी: ०७ रुग्ण
या सातही भागांतील एकूण १९८ रुग्ण सध्या विविध प्रकारच्या चर्मरोगांशी लढा देत आहेत. लहान मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. या निष्कर्षांनंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. “पैशांच्या हव्यासापोटी आमच्या पिढ्या उद्ध्वस्त करणाऱ्या या इथेनॉल प्रकल्पावर तात्काळ दंडात्मक कारवाई करून तो बंद करण्यात यावा,” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आरोग्य विभागाने तात्पुरत्या स्वरूपात सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरू केले असून, बाधित गावांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. आता या सर्वेक्षणाच्या अधिकृत अहवालाच्या आधारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित इथेनॉल प्रकल्पावर फौजदारी गुन्हा दाखल करणार की नेहमीप्रमाणे नोटीस देऊन सोडून देणार? याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यांचे आणि ब्रह्मपुरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.





















