दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आला होता. मात्र, रस्ता पूर्ण झाल्यानंतर आता चेंबरच्या कामासाठी नव्याने केलेला रस्ता पुन्हा फोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे PWDच्या नियोजनावर तसेच संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या पद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या रस्त्याच्या डांबरीकरणापूर्वी रस्त्यावरील चेंबरची झाकणे रस्त्याच्या पातळीला व्यवस्थित बसविणे अपेक्षित होते. मात्र, चेंबरची योग्य व्यवस्था न करता त्यावर डांबरीकरण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. आता रस्ता पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेकडून चेंबर शोधण्यासाठी व त्यांची पातळी रस्त्याच्या लेव्हलला आणण्यासाठी नव्याने डांबर फोडण्याचे काम सुरू आहे.
ऐन पावसाळ्यात घाईघाईने रस्ता पूर्ण करण्यात आला आणि अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा त्याच रस्त्याची तोडफोड करण्याची वेळ आली, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी चेंबरची कामे का पूर्ण करण्यात आली नाहीत, असा सवालही उपस्थित होत आहे.
नुकत्याच केलेल्या रस्त्याची पुन्हा तोडफोड झाल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता असून, या कामाची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.
या संपूर्ण प्रकाराची PWDने तातडीने पाहणी करून संबंधित ठेकेदाराच्या कामाची गुणवत्ता, नियोजन आणि देखरेख यांची चौकशी करावी, तसेच रस्ता पुन्हा तोडण्याची वेळ का आली याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






















