Sharad Pawar NCP : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून फुटीर खासदारांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
स्वत: उद्धव ठाकरे यांनी सहा खासदारांच्या मतदार संघाचा दौरा केला. त्याचदरम्यान, आमदार सचिन अहिर यांनी मोठा धक्का देत ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे गटात सामील झाले. इतकेच काय तर त्यांना विधानपरिषदेचे उपसभापती पद देखील मिळाले.
‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांना वेग
यानंतर आता ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांनी जोर धरला आहे. पक्षांतराच्या आणि राजकीय ऑफरच्या या चर्चांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले. काल बुधवारी, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘ऑफर आली तर विचार करू’ असे म्हटले होते. ज्यानंतर अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली.
यावर आता अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात मी ते विधान केले होते. ‘ऑफरवर विचार करू’ या माझ्या वक्तव्याचा पूर्णपणे वेगळा अर्थ काढला गेला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे एकत्र आहे आणि भविष्यातही एकत्रच राहील. आम्ही अशा कोणत्याही निरर्थक चर्चांकडे लक्ष देत नाही.” Sharad Pawar NCP
पुढे ते म्हणाले, “आम्ही सर्व खासदार एकत्र आहोत आणि आमच्यात कोणतीही फूट किंवा नाराजी नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी आदरणीय शरद पवार साहेब जे सांगतील, तेच धोरण आम्ही सर्व जण पाळू. त्यामुळे आमच्याबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. आमचा काही गट आहेत, हे आम्हालाच माहिती नसते. पण सूत्रांना माहिती असते,” असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटल्यानंतर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पाच खासदार फुटणार असून, त्यांनी वेगळा गट तयार केल्याचीही चर्चा रंगली होती. या सर्व चर्चांवर आता अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. Sharad Pawar NCP






















