दौंड:(प्रतिनिधी) संघराज गायकवाड
दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील नगरकर बंगला ते कुद्री बंगला या रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्याच्या काळात सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाची शक्यता असतानाही डांबरीकरणाचे काम करण्यात आल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला असून, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम दिवसा न करता सायंकाळी ५ नंतर करण्यात आले. पावसाळ्यात अशा प्रकारे डांबरीकरण केल्यास रस्त्याचा दर्जा टिकेल का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांचा दावा आहे की, या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या कामाची गुणवत्ता, तांत्रिक निकषांचे पालन आणि कामाची प्रत्यक्ष पाहणी झाली आहे का, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
पावसाळ्यात करण्यात आलेले डांबरीकरण काही दिवसांत खराब झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी या कामाची तातडीने चौकशी करून प्रत्यक्ष तपासणी करावी आणि सर्व निकषांचे पालन झाले आहे की नाही, याबाबत संबंधित विभागाने खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.
सरकारी निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये दर्जा आणि पारदर्शकता राखणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी असून, या प्रकरणी वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.






















