सिरोंचा तालुका:(प्रतिनिधी जाबिर खान)सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पाच वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर पालकांनी वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करत सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आरोग्य व्यवस्थेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मृत बालकाचे नाव सचिन मोहन चेन्नूरी (रा. रगायपल्ली) असे आहे. माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिरासाठी त्याची निवड झाली होती. त्यानिमित्ताने ५ जुलै रोजी त्याला सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे पाठविण्याची तयारी सुरू होती. दिवसभर त्याची प्रकृती स्थिर होती आणि तो इतर मुलांसोबत खेळत असल्याचेही सांगितले जाते.
मात्र, रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ड्युटीवरील परिचारिकेने त्याला इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच त्याची प्रकृती अचानक बिघडल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून बालकाला मृत घोषित केले.
घटनेनंतर बालकाच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत, “आमचा मुलगा दिवसभर व्यवस्थित होता. इंजेक्शन दिल्यानंतरच त्याची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी केली आहे.
या प्रकरणानंतर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. बालकाला नेमके कोणते इंजेक्शन देण्यात आले होते? ते देण्याचा वैद्यकीय सल्ला कोणी दिला होता? संबंधित औषधाची गुणवत्ता व वैधता तपासण्यात आली होती का? तसेच उपचार प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला होता का? या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडूनही होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत चौकशी अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






















