सिन्नर : प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर संस्थानातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला असून, नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील प्रवास पूर्ण झाल्यानंतर पालखीचा ताबा अहिल्यानगर पोलीस दलाकडे अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात सुपूर्त करण्यात आला.
वावी पोलीस स्टेशन हद्दीत आयोजित हस्तांतरण सोहळ्यात नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. स्वामी सर (IPS) यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. सुदर्शन सर (IPS) यांच्याकडे पालखी सोहळ्याची जबाबदारी औपचारिकरित्या सुपूर्त केली. यावेळी दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयातून पालखी सोहळा सुरक्षित, सुरळीत आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना व माहितीची देवाणघेवाण केली.
पालखी हस्तांतरणाचा हा क्षण उपस्थित वारकरी, भाविक आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष ठरला. संतांच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक करण्यात आले.
यापुढे पालखी सोहळ्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी अहिल्यानगर पोलीस दलाकडे सोपविण्यात आली असून, पुढील प्रवासही शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.






















