दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मंजूर विकासकामे तातडीने सुरू करून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा तथा दौंड शहर मंडळाच्या पदाधिकारी सौ. सरिता गौरव कुल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून दौंड शहरातील नागरिकांसाठी विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. संबंधित कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही अनेक कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही, तर काही कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे रखडलेल्या कामांना तातडीने गती देऊन ती दर्जेदार पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनामध्ये बोरोवकेनगर ते सरपंच वस्ती मार्ग, सरपंच वस्ती ते बीजगुणन मार्ग तसेच पंचगंगा सोसायटी ते शिवराज नगर या प्रमुख रस्त्यांच्या कामांना त्वरित सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना सौ. सरिता कुल (उपाध्यक्षा, महिला मोर्चा, दौंड शहर मंडळ), मीना जाधव (उपाध्यक्षा, महिला मोर्चा, पुणे जिल्हा), राहुल भंडारी (उपाध्यक्ष, दौंड शहर), नागेश बेलूरकर (उपाध्यक्ष, दौंड शहर), रिया रामदासानी (उपाध्यक्षा, महिला मोर्चा, दौंड शहर) तसेच विक्रम कोऱ्हाळे, सागर कुंभार, राहुल आढाव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन रखडलेल्या विकासकामांना गती द्यावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.























