Times of Maharashtra Desk : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती जाहीर केली आहे. यासंदर्भात अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले असून, राजीनामा स्वीकारल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करूनही त्यांनी दिली. राजीनामा स्वीकारल्यानंतर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद अधिकृतपणे रिक्त झाले आहे.
अजित पवार यांचे मत
अजित पवार म्हणाले, “माननीय न्यायालयाच्या निकालानंतर आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा मला सुपूर्द केला आहे. कायदे-नियम सर्वोच्च आहेत आणि कोणत्याही व्यक्तीपेक्षा ते सर्वोतोपरी आहेत. या तत्त्वानुसार हा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे. सार्वजनिक जीवन नेहमी संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावे, हाच आमच्या पक्षाचा मार्ग आहे.”
माणिकराव कोकाटे कोणत्या प्रकरणात अडचणीत?
नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर भागातील व्ह्यू अपार्टमेंट्स प्रकरणात, माणिकराव कोकाटे यांनी ३० वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवून अल्प उत्पन्न गटासाठी सदनिका प्राप्त केल्या होत्या. स्वत:सह त्यांचा भाऊ विजय कोकाटे, तसेच पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांनीही सदनिका मिळवलेल्या होत्या.या प्रकरणी फेब्रुवारी २०२५ मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले होते. त्यांनी नाशिक सत्र न्यायालयात अपील केली होती, परंतु सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली. सध्या माणिकराव कोकाटे उच्च न्यायालयात अपील करत आहेत.
यापूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र पाठवून माणिकराव कोकाटेंकडील खाती अजित पवार यांच्याकडे देण्याची मागणी केली होती, ज्यास राज्यपालांनी मंजुरी दिली. त्यामुळे कालपासून माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री होते.राजीनामा प्रक्रियेनंतर राज्यातील मंत्रिपद आणि पक्षीय स्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पुढील घडामोडी महत्वाच्या ठरणार आहेत.






















