दौंड: (प्रतिनिधी संघराज गायकवाड) जय मल्हार आषाढी पायी दिंडी, ढोकसांगवी (ता. शिरूर, जि. पुणे) पालखीचे श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे अत्यंत भक्तिमय व आनंदमय वातावरणात दौंड नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत यांच्या हस्ते उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

यावेळी उपस्थित वारकरी बांधवांना मार्गदर्शन करताना नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत यांनी वारीचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. आषाढी व कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली पदयात्रा म्हणजे वारी होय. ‘पंढरीचा वास, चंद्रभागेचे स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन’ या ध्यासाने लाखो वारकरी दरवर्षी वारीत सहभागी होतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांमुळे वारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
वारी ही समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा असून, येथे श्रीमंत-गरीब, उच्च-नीच असा कोणताही भेदभाव नसतो. सर्व वारकरी एकाच भक्तिभावाने “राम कृष्ण हरी”चा अखंड गजर करत पुढे जातात. वारीमधील शिस्त, नियोजन, दिंड्यांची व्यवस्था, भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक सोहळे हे समाजासाठी आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पायी वारीमुळे मानसिक शांतता, आत्मिक समाधान आणि शारीरिक सुदृढता लाभत असून, वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची जिवंत परंपरा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कै. शिवाजी महादू पाचंगे हे या दिंडीचे संस्थापक असून, यंदा दिंडीचे १३ वे वर्ष आहे. खंडोबा देवाची ही दिंडी सुमारे २०० वारकऱ्यांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे … यांच्या वतीने सर्व वारकरी बांधवांसाठी स्वादिष्ट नाश्त्याचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री चंद्रकांत मलगुंडे, रामदास पाचंगे, माजी सरपंच पंढरीनाथ मलगुंडे, राजाराम पाचंगे, सुरेश पाचंगे, बन्सी पाचंगे, म्हस्कु मलगुंडे, कैलास पाचंगे, जयसिंग मलगुंडे, बापुराव मलगुंडे, शांताराम पाचंगे, संजय श्रीराम, शिवाजी मलगुंडे, विलास शिंदे व पुजारी शरद गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
दत्त पीठ दत्त मंदिर संस्थानच्या वतीने नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत यांनी सर्व वारकरी बांधवांचा श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त बुवा सावंत तसेच ज्येष्ठ विधीतज्ञ श्री विलास बर्वे उपस्थित होते. स्वागत समारंभानंतर जयघोष आणि विठ्ठलनामाच्या गजरात दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.






















