सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ग्रामसचिवालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. भाजप नेते उदय सांगळे यांच्या पाठपुराव्यातून ही वास्तू साकार झाली असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे होते.
यावेळी सरपंच दत्तू गोफणे, उपसरपंच बस्तीराम गुळवे, राजाराम वारुंगसे, सतीश सदगीर, सविता वारुंगसे, माजी सरपंच भाऊराव सदगीर, वाळीबा लेहकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नाना वारुंगसे, श्रीहरी गोफणे, नंदू गुरुकुले, राजाराम सदगीर, भास्कर गोफणे, राजेंद्र गोफणे, वैभव गोफणे, किसन सदगीर, सावळीराम सूर्यवंशी, योगेश गुजराथी, उत्तम सदगीर, प्रभाकर गोफणे, प्रभाकर उघडे, मधुकर सदगीर, शरद माळी, देविदास वाजे, भाऊसाहेब ढोली यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदय सांगळे यांनी मनोगतात सांगितले की, पूर्वी ग्रामपंचायतीचा कारभार अतिशय लहान आणि मोडकळीस आलेल्या इमारतीतून चालत होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि आधुनिक ग्रामसचिवालयाची उभारणी करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळालेल्या कालावधीत अनेक विकासकामे पूर्णत्वास नेल्याचे त्यांनी नमूद केले. डुबेरे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, सटवाई मंदिरात भव्य सभागृह, शाळेची इमारत, दवाखाना, स्काय वॉक तसेच विविध विकासकामांसाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. सिन्नरमध्ये आधुनिक तालीम उभारून परिसरातील मल्लांसाठी सुविधा निर्माण केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांनी कृष्णनगरमध्ये उभारण्यात आलेली ग्रामसचिवालयाची वास्तू ग्रामस्थांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या इमारतीतून लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभार व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण वाजे यांनी पूर्वी दहा बाय दहाच्या खोलीत चालणारा ग्रामपंचायतीचा कारभार आता प्रशस्त आणि सुसज्ज इमारतीत सुरू होणार असल्याचे सांगितले. गावातच जागा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि ग्रामसचिवालयासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात उदय सांगळे यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात डॉ. मनोज सदगीर यांनी उदय सांगळे यांनी दिलेला शब्द पाळत ग्रामसचिवालयाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यापूर्वीही गावातील विविध मंदिरांसाठी सभामंडप, स्मशानभूमी आणि इतर विकासकामे पूर्ण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिल्याचे त्यांनी सांगितले.






















