दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू करून अनेक वर्षे उलटली असली तरी दौंड शहरात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे शहरात सर्रास प्लास्टिकचा वापर होत असताना नगरपालिका प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
शहरातील किराणा दुकाने, भाजी मार्केट, फळ विक्रेते, हॉटेल्स तसेच विविध व्यावसायिकांकडून ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा आणि वापर सुरू असूनही संबंधित यंत्रणा कारवाई करत नसल्यामुळे प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
प्लास्टिकमुळे नाले तुंबणे, कचऱ्याचे प्रमाण वाढणे, जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होणे आणि पर्यावरणाचे नुकसान होणे यासारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. शासनाने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर नियम लागू केले असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.
नागरिकांचा प्रश्न आहे की, शहरात उघडपणे प्लास्टिकची विक्री होत असताना नगरपालिका प्रशासनाला याची माहिती नाही का? आणि माहिती असल्यास संबंधित विक्रेते व पुरवठादारांवर कारवाई का केली जात नाही?
दौंड शहरातील पर्यावरणप्रेमी व जागरूक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवून बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री व वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.






















