छत्रपती संभाजीनगर:(विशेष प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा केला जात असला, तरी आता केवळ विजयाचा आनंद साजरा करण्यापेक्षा सहकार क्षेत्राच्या भवितव्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल्याची भावना सहकार क्षेत्रातील जाणकार आणि शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. “शेतकऱ्यांची बँक” अशी ओळख असलेल्या या संस्थेच्या संचालक मंडळात प्रत्यक्ष शेतीशी निगडित, शेतकऱ्यांच्या अडचणींची जाण असलेले आणि सहकाराची मूल्ये जपणारे प्रतिनिधी किती प्रमाणात पोहोचले, हा प्रश्न आजही कायम आहे. निवडणूक जिंकणे हे अंतिम ध्येय नसून शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरणे हीच खरी कसोटी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सन २००६ मध्ये जिल्हा बँकेतील कथित नोकरभरती घोटाळ्याची चर्चा आजही राज्याच्या सहकार क्षेत्रात केली जाते. त्या पार्श्वभूमीवर नव्या संचालक मंडळासमोर पारदर्शक, नियमबद्ध आणि विश्वासार्ह प्रशासन उभारण्याचे मोठे आव्हान आहे. भरती प्रक्रिया, कर्जवाटप, आर्थिक व्यवहार, प्रशासकीय निर्णय आणि बँकेच्या धोरणांमध्ये पूर्ण पारदर्शकता राखली गेली, तरच सहकार क्षेत्रावरील विश्वास अधिक दृढ होईल.
बँकेवर विविध राजकीय पक्षांचे नेते, मंत्री आणि सहकार क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती निवडून आल्या असल्या, तरी सर्वसामान्य शेतकरी, सभासद आणि ठेवीदारांच्या अपेक्षांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राजकीय समीकरणांपेक्षा शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची जबाबदारी नव्या संचालक मंडळावर आहे.
शेतकऱ्यांच्या अपेक्षाही स्पष्ट आहेत. पीककर्ज वेळेत उपलब्ध व्हावे, कर्ज प्रक्रियेत होणारा विलंब आणि अनावश्यक अडथळे दूर व्हावेत, व्याजदर वाजवी असावेत, ग्रामीण भागात डिजिटल बँकिंग सेवा प्रभावीपणे पोहोचाव्यात आणि बँकेतील प्रत्येक आर्थिक व्यवहार पारदर्शक पद्धतीने व्हावा. त्याचबरोबर भविष्यातील भरती प्रक्रिया गुणवत्ता, पात्रता आणि नियमानुसारच राबविण्यात यावी, अशी मागणीही शेतकरी व सभासदांकडून सातत्याने होत आहे.
सहकार क्षेत्र हे विश्वास, पारदर्शकता आणि लोकसहभाग या तीन तत्त्वांवर उभे आहे. त्यामुळे नवीन संचालक मंडळाने पक्षीय राजकारणापेक्षा सहकाराची मूल्ये जपत शेतकरी, सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास जिंकण्यावर भर दिल्यासच ही निवडणूक खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कोणत्याही एका गटाची किंवा पक्षाची नसून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी आणि सभासदांची सामूहिक संस्था आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील प्रत्येक निर्णयात ही भावना प्रतिबिंबित होणे, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.






















