परभणी (जिल्हा प्रतिनिधी अनिल शेटे) : मानवी जीवन समृद्ध, सुसंस्कृत आणि आनंदी बनविण्यासाठी आरोग्य आणि संस्कृती या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. निरोगी शरीर आणि सुदृढ मन ही व्यक्तीच्या प्रगतीची पहिली पायरी असते, तर संस्कृती ही समाजाला विचार, मूल्ये आणि ओळख देणारी शक्ती असते. त्यामुळे आरोग्य आणि संस्कृती हे समाजरचनेचे दोन भक्कम आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दि.२६ मे रोजी केले.
तालुक्यातील मौजे.पिंपळदरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन आणि स्थानिक आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मिक ऋषी सभागृहाच्या लोकार्पण आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ज्या समाजात नागरिकांचे आरोग्य चांगले असते आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक केली जाते, तो समाज अधिक प्रगत, सुसंवादी आणि सक्षम बनतो.
ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी अशी सार्वजनिक विकासकामे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.पिंपळदरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन आणि महर्षी वाल्मिक ऋषी सभागृहाचे लोकार्पण

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्र हे केवळ एक इमारत नसून, ग्रामीण भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार प्रत्येक नागरिकांना परवडणारी, दर्जेदार आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळणे, हा त्यांचा हक्क आहे. शिवाय लसीकरण, माता-बाल संगोपन, साथरोग नियंत्रण आणि प्रथमोपचार यांसारख्या सेवा गावातच उपलब्ध झाल्याने उपचारासाठी होणारी दगदग व खर्च कमी होईल. हे केंद्र उभे राहिल्यावर आजारावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये, यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यावर भर देणे शक्य होईल.
महर्षी वाल्मिक ऋषी यांचे नाव या सभागृहाला देणे, हे अत्यंत औचित्यपूर्ण आहे. रामायणासारखे कालातीत महाकाव्य देणारे वाल्मिकी हे केवळ कवी नव्हते, तर समाजपरिवर्तनाचे द्रष्टे होते. त्यांनी दाखवून दिले की माणसाचा जन्म नव्हे, तर कर्म त्याची ओळख ठरवते. त्यामुळे हे सभागृह ज्ञान, कला, संवाद आणि सामूहिक विचारमंथनाचे केंद्र व्हावे. इथे शाळेची स्नेहसंमेलने होतील, शेतकऱ्यांच्या कार्यशाळा होतील, महिला बचत गटांच्या बैठका होतील आणि युवकांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गही होतील. एका इमारतीतून आरोग्य मिळेल, तर दुसऱ्यातून वैचारिक समृद्धी. या दोन्हीचा समतोल साधला तरच खऱ्या अर्थाने स्वस्थ आणि सुशिक्षित गाव ही संकल्पना साकार होईल, असाही विश्वास आ.डॉ.गुट्टे यांनी व्यक्त केला. यावेळी गुट्टे काका मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर मानसिक व सामाजिक स्वास्थ्य अत्यंत महत्त्वाचे!
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात भौतिक प्रगतीसोबत मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवणे आवश्यक आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लोकांमध्ये संवाद कमी होत चालला आहे. परिणामी मानसिक तणाव, एकटेपणा आणि सामाजिक दुरावा वाढताना दिसतो. अशा परिस्थितीत समाजाने पुन्हा एकदा सांस्कृतिक मूल्यांकडे वळणे आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे गरजेचे आहे. कुटुंबव्यवस्था, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा समतोल राखल्यास समाज अधिक सक्षम बनेल, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.






















